अतिरेक्यांच्या उगमापाशी जाऊन त्यांची दिशा बदलायला हवी. कोणताही धर्म अतिरेक्यांना प्रोत्साहन देत नाही असे म्हटले जाते.परंतु अतिरेक्यांच्या ह्रदयाशी धार्मिक भावना असतात हे उघड सत्य आहे. त्यामुळे अतिरेक्यांच्या बंदोवस्तासाठी धार्मिक भावनांचा तळ गाठला पाहिजे.
धार्मिक भावनांचा उगम धार्मिक मिथक्कथांतून होतो. या मिथकांचे अर्थ लावण्याचे काम त्यात्या धर्माच्या धर्मगुरुंनी केलेले असते. आपलाच धर्म सर्वश्रेष्ठ,दुसऱ्या धर्माच्या प्रतिकांना नष्ट करणे हे पुण्याचे काम, आपल्या लोकांची संख्या वाढवली व दुसऱ्यांची घटवली तर आपल्याला स्वर्गात उत्तम स्थान मिळते वगैरे कल्पना भाविकांच्या डोक्यात घातल्यावर त्याला अतिरेकाची फळे येतात. शेवटी ह्या अतिरेक्यांच्या कोपाला आपलेच लोक बळी पडायला लागले तरी या धर्मगुरुंना हे कसे झाले याचा उलगडा होत नाही. यासाठी सर्व धर्माच्या धर्मगुरुंचे प्रबोधन होणे जरूर आहे.
माजी राष्ट्रपती स्व. डॉ. कलाम यांनी सर्व धर्माच्या धर्मगुरुंच्या मुलाखती घेऊन काही सर्वसामान्य तत्त्वे शोधण्याचा प्रयत्न केला होता. त्याच पद्धतीने समाज शास्त्रज्ञ, मनोवैज्ञानिक व धर्मगुरुंचा एक अभ्यास गट तयार करुन सर्व धार्मिक कथांचा अर्थ आपल्या देशाच्या संस्कृतीशी व लोकशाहीशी सुसंगत कसा करता येईल हे पहायला हवे. तरच धर्म समाजाची धारणा करणारे होतील!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा