आपल्या घरांमध्ये आपल्या गरजेपेक्षा जास्त अन्न शिजवले गेल्यास,उरलेले टाकून दिले जाते. लग्न समारंभात किंवा तशाच मोठ्या कार्यक्रमात खूप वाढलेले अन्न न संपल्यामुळे कचराकुंडीत टाकले जाते. अशाप्रकारे फेकून दिलेले अन्न पशु, पक्षी, कुत्री, मांजरे व किडे मुंग्या खातात, तर मग ते वाया जाते असे कसे म्हणता येईल?
इतर जीवांनी त्या अन्नावर उपजीविका करणे म्हणजे त्या अन्नाची विल्हेवाट लावणे होय! तो त्या अन्नाचा उपयोग नाही. ते अन्न शिजवून मानवी जीवनासाठी तयार केलेले असते ते फेकून देण्याची वेळ येणे म्हणजेच ते अन्न वाया घालवणे किंवा नासाडी करणे होईल.निसर्गातील पशुपक्षी किडेमुंग्या हे आपल्या फेकून दिलेल्या अन्नावर जगत नसून निसर्गाच्या चक्रामध्ये त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या अन्नाचा उपयोग करून निसर्गाचे चक्र सुरू ठेवण्याचे काम करतात. माणसाच्या खाण्या-पिण्याचा त्या चक्रातील त्यांच्या जगण्याशी संबंध येतो तेवढाच!
अन्न, पाणी व हवा ही राष्ट्रीय संपत्ती आहे.या संपत्तीचा योग्य वापर न केल्यामुळे आपलेच काही भाऊबंद अन्न पाण्याअभावी प्रदूषित हवे मुळे नीटपणे जगू शकत नाहीत. त्यांचा योग्य प्रमाणे वापर करणे ही जबाबदारी आपण मानणे हा मानवी संस्कृतीचा भाग आहे.
या प्रश्नाची दुसरी बाजू, आपल्या शहरात वाढणारी भटक्या कुत्र्यांची संख्या आपण फेकून दिलेल्या अन्नामुळे वाढत असते हे आपल्या लक्षात येत नाही. अन्नधान्य व्यवस्थित न ठेवल्यामुळे उंदरांची संख्या वाढते. सांडपाण्याचे व्यवस्थापन न केल्यामुळे डासांची संख्या वाढते. त्यानंतर कुत्री, उंदीर व डास यांच्यावर आणि त्यापासून होणाऱ्या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च होतो. अन्न, पाणी व हवा यांचे योग्य वापर व्यवस्थापन केल्यास असे अनेक प्रश्न सुटू शकतात!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा