विवेक एक चिंतन...
मित्रांनो,आपण सर्व विवेकाचे विद्यार्थी आहोत. आपण विवेक शिकत आहोत. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने विचार करून योग्य काय ते शोधून काढण्याचा प्रयत्न करीत आहोत.संपूर्ण मानव जात आज अभूतपूर्व अशा संकटाशी सामना करीत आहे. काही देश पूर्णपणे हतबल झालेले आहेत. आपल्या देशाच्या उंबरठ्यावर हा वनवा येऊन ठेपलेला आहे. अशावेळी विवेकाची खरी गरज आहे. या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधणे ही आपली पहिली गरज आहे.आपणा सर्वांना याची अंतकरणापासून जाणीव आहे. सध्याच्या परिस्थितीत आपण विवेकावर चिंतन करणे आवश्यक आहे.
विवेकाचा अर्थ काय?
सोक्रेटीस हा एक विवेकी तत्त्वज्ञ.त्यांनी स्वतःविषयी म्हटले, "मला काहीच समजले नाही एवढेच मला समजले आहे" सॉक्रेटीसांचे हे उद्गार म्हणजे विवेकाचा पाया आहे.आज मी असे बोलतो की जणू काही मला सर्व समजले आहे. साक्रेटीसांच्या समकालीन गौतम बुद्ध म्हणतात,"तुम्ही स्वतःचे दीप व्हा. कोणत्याही महापुरुषांवर किंवा महान ग्रंथावर डोळे मिटून विश्वास ठेवू नका.स्वतः विचार करा." हा विवेकाचा दुसरा विचार. आज मी स्वतः विचार करतो का?माझे सगळे बोलणे दुसऱ्याकडून घेतलेल्या माहितीवर आधारलेले असते. खऱ्याखोट्याचा शोध न घेता,स्वतः विचार न करता मी माझेच तेवढे खरे असे सांगत असतो. बुद्धानंतर ख्रिस्त आले. एका असहाय्य बाईवर दगडफेक करणाऱ्या जमावाला ख्रिस्ताने सांगितले, "तुमच्यापैकी ज्यांनी कोणताच गुन्हा केलेला नाही, त्याने पहिला दगड मारा" सगळे दगड गळून पडले. मीदेखील दुसऱ्याला गुन्हेगार ठरवतो. लोकांच्या चुका शोधतो. परंतु माझी काही चूक होते हे माझ्या लक्षात येत नाही. त्यानंतर गांधीजींनी सांगितले,"जो बदल तुम्हाला दुसऱ्या मध्ये हवा आहे तो स्वतःमध्ये करा." मी माझ्या मध्ये कोणताच बदल करू इच्छित नाही. कोणी काय करावे ते सगळ्या जगाला सांगत सुटतो.
आपल्या ग्रुप वरील चर्चेच्या दरम्यान या चारही विचारांना मी संपवून टाकतो.
साक्रेटीस,बुद्ध,ख्रिस्त आणि गांधी यांचे हे चार विचार विवेकाचा पाया आहेत असे मला वाटते. ते ज्याच्या आचरणात आहेत तो विवेकी होय!
सर्वांना वाटते की विवेकी म्हणजे सर्वज्ञ! स्वतःला विवेकी समजणारेही असेच समजतात. पण तोच त्यांचा अविवेक ! विवेकी आपले तेच खरे असे समजत नाही.दुसऱ्याचेही विचार समजून घेतो. आपल्यासारखे दुसऱ्याला मत असते. आणि ते आपल्यापेक्षा वेगळेही असू शकते हे त्याला समजते.मते खरी किंवा खोटी नसतात.वस्तुस्थिती आणि मते याच्यातील फरक तो जाणतो. वस्तुनिष्ठ निरीक्षणातून वस्तुस्थिती कळते. तरीही ती सत्य असतेच असे नाही.कारण निरीक्षक हा एक विशिष्ट मत असलेला माणूस असतो. विवेकाचे सामर्थ्य वस्तुस्थितीच्या ज्ञानात असते. त्यामुळे आपल्याला आपल्या ज्ञानेंद्रिया मार्फत मिळणाऱ्या वस्तू स्थितीच्या ज्ञानावर आधारित विवेक कार्य करतो.अनेक माणसानी निरीक्षण करून केलेल्या विचारातून विवेक समृद्ध होतो. म्हणून विवेक ही वैयक्तिक बाब नसून ते सामुहिक सामर्थ्य आहे. त्यासाठीच विचार करणाऱ्या गटांची थिंक टॅंकची गरज असते.
विज्ञानाच्या विकासाबरोबर विवेकाची वाढ झाली आहे. विज्ञानाने आणलेली निरीक्षणाची साधने(टेलिस्कोप,मायक्रोस्कोप इत्यादी) ज्ञानेंद्रियांच्या सामर्थ्यात वाढ करून देणारी आहेत.त्यामुळे वस्तुस्थितीचे ज्ञान वाढले. विवेक अधिक प्रगल्भ झाला. वैज्ञानिक पद्धतीने काम करण्याने वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण झाला.त्यामुळे व्यक्तिनिरपेक्ष निरीक्षणे करण्याची माणसाची क्षमता वाढली. केवळ निसर्गात घडणाऱ्या घटनांचे निरीक्षण करूनच ज्ञान मिळवण्या ऐवजी प्रयोग करून अधिक जलद पद्धतीने ज्ञान मिळवता येऊ लागले. त्यामुळेच विज्ञानाच्या विकासाबरोबरच विवेकाचा प्रसार वाढला. वैज्ञानिक पद्धती सर्व क्षेत्रांमध्ये सर्रास वापरली जाऊ लागली. विवेका मध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन अधिक महत्वाची भूमिका बजावू लागला.आता तर असे म्हणता येईल की,
विवेक म्हणजे वैज्ञानिक दृष्टीकोन वापरून मानवी वेदना कमी करणारी कृती देणारा विचार होय!
या विवेकाच्या समर्थ्यानेच आपण सर्व संकटावर मात करून साऱ्या मानव समाजाला सुखी व संपन्न करूया!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा