मी एकटा आहे ही भावना प्रत्येक माणसात असते.ती घालवण्यासाठीच माणूस दुसऱ्यांशी जोडून घेण्याचा प्रयत्न करतो.त्यातूनच सण, समारंभ,कार्यक्रम व कर्मकांड निर्माण झाली आहेत. आईच्या गर्भात एका पेशीपासून आपली निर्मिती सुरू होते.आणि आपल्याला जाणीव होते तोपर्यंत आपला एकटेपणा स्पष्ट होत जातो.जन्माला येताना काही वेळा जुळे जन्माला येत असले तरी प्रत्येक जण एकटाच असतो.प्रथम आपल्या सोबतीला असते ती आपली आई.त्यानंतर येतात ते आपले बाबा.त्यानंतर भावंडे,मित्र, मैत्रिणी,बायको,मुले,नातवंडे व शेवटी आपण एकटेच सजीवता सोडून निर्जीवते कडे जातो. आपले माणूस म्हणून अस्तित्व संपते.आपल्या जवळच्या लोकांच्या सहवासात आयुष्यभर असलो तरीही आपला आतला एकटेपणा आपण टाळू शकत नाही.त्यासाठी आपण सोबतीला देवाला घेत असावे.कारण आपण आपल्या कल्पनेने निर्माण केलेल्या देवाला आपल्या आत घेऊ शकतो. म्हणजे देवावरील भक्ती एकटेपणा घालवण्याची एक युक्ती आहे. परंतु ती काल्पनिक गोष्ट आहे हे आपल्याला पूर्णपणे ठाऊक असते.ज्या बुद्धिमत्तेच्या सामर्थ्याने व कल्पकतेने आपण आपल्या मनात देवाची निर्मिती करतो ती आपली प्रतिभा आपल्या सोबत आपल्या जाणिवेच्या काळात सतत असते.ही आपली प्रतिभा आपल्याला सतत सोबत करत असते. या प्रतिभेला आपण आपली आतली सोबत का मानू नये? ही आपली आतली प्रतिभा आपल्या मानवी संस्कृतीचे संचित असून तिचा काही भाग आपल्या जनुकांमध्ये ही असतो. आपण हसायला,बोलायला व चालायला सहजपणे शिकतो. याची नोंद आपल्या
जणुकांत असते. आपल्या पूर्वजांनी मिळवलेले ज्ञान आपल्याला आपल्या ज्येष्ठांकडून मौखिक स्वरूपात किंवा पुस्तकाच्या रूपाने उपलब्ध असते. आपला मेंदू जोपर्यंत शाबूत असतो तोपर्यंत आपल्याला एकटेपणाची जाणीव असते आणि त्याच काळात आपली बुद्धी व प्रतिभा जागृत असते. मेंदूचे कार्य थांबले की आपल्या जाणिवेच्या अंता बरोबरच एकटेपणाची भावना ही नाहीशी होते. जिवंत असताना आपण सतत आपल्या प्रतिभेची सोबत केली पाहिजे म्हणजे आपला एकटेपणा नाहीसा होईल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा